लाडकी बहिण योजनेसाठी 50 लाख महिला अपात्र; सरकारच्या तिजोरीवरील भार कमी



सध्या राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेत  मोठ्या प्रमाणावर छाननी सुरू आहे. या योजनेत सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे केवळ दोन महिन्यांत 9 लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. जानेवारीत 5 लाख आणि फेब्रुवारीत 4 लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. अजूनही छाननी प्रक्रिया सुरू असल्यामुळे अपात्र महिलांची संख्या 50 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

निवडणुकीपूर्वी कोणतीही पडताळणी नाही

विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने कोणतीही छाननी न करता तब्बल 2 कोटी 40 लाख महिलांना दरमहा 1500 रुपये वाटप सुरू केले होते. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर दरमहा 3600 कोटी रुपयांचा भार पडत होता. मात्र, सत्तेवर आल्यानंतर सरकारने लाभार्थ्यांच्या पात्रतेची छाननी सुरू केली आहे. तसेच महिलांना स्वतःहून अर्ज मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पात्रतेचे कठोर निकष आणि अनियमितता

काही प्रकरणांमध्ये पुरुषांनीही लाभार्थी म्हणून नोंदणी केल्याचे समोर आले आहे. तसेच, काही जणांच्या नावावर एकापेक्षा अधिक खाती असल्याचे आढळले आहे. राज्य सरकारने पात्रतेचे कठोर निकष लावून लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, महिलांची संख्या घटल्याने सरकारच्या तिजोरीवरील भार दरमहा 135 कोटी आणि वर्षाला 1620 कोटी रुपयांनी कमी होणार आहे.

योजना कोणत्या वयोगटासाठी?

या योजनेत 30 ते 39 वयोगटातील 29% महिलांचा समावेश होता. 40-49 गटातील 23.6%, 50-65 गटातील 22% आणि 60-65 वयोगटातील 5% महिलांचा समावेश आहे. मात्र, अलीकडच्या छाननीनंतर अनेक महिलांची नावे वगळली गेल्याने त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने